जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, पालघर, रायगड या जिल्ह्यांसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाकडून (IMD) एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. उद्या, शुक्रवारी हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील तब्बल १८ राज्यांमध्ये पावसाचा ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारीही महाराष्ट्रासह देशातील 18 राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. अनेक भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 80 ते 85 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव तसेच घाटमाथ्यावरील भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
विशेषतः चाळीसगाव तालुक्यावर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील हवामान प्रणालीचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने तेथे काही ठिकाणी दमदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, पालघर आणि रायगडसह अनेक भागांत रस्ते पाण्याखाली गेले असून, काही ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्येही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, मेघालय, मध्य प्रदेश, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.








