जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेत ई-केवायसी प्रक्रियेसाठी देण्यात आलेली मुदत संपल्यानंतर आता सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर केली आहे. आता महिलांना ३० एप्रिल २०२६ पर्यंत केवायसी पूर्ण करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

यापूर्वी ३१ मार्च रोजी ई-केवायसीची मुदत संपली होती. मात्र विविध तांत्रिक अडचणी, चुकीची माहिती भरल्यामुळे लाभ बंद होणे तसेच काही भागात झालेल्या गारपिटीमुळे अनेक महिलांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिली होती. याबाबत मोठ्या प्रमाणात निवेदने आणि तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही किंवा प्रक्रियेत काही चुका झाल्या आहेत, त्यांनी ३० एप्रिलपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह केवायसी पूर्ण करावी, अन्यथा योजनेचा लाभ थांबू शकतो, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.












