जळगाव लाईव्ह न्यूज । राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत आठव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले असून, राज्यातील सुमारे ८९.७५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात १७९८.७८ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात हा निधी थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने वितरित करण्यात आला.

या वितरणात जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ₹७७.४० कोटींचा निधी मिळाला आहे. राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. नियमितपणे हप्त्यांद्वारे दिली जाणारी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने पारदर्शकता वाढली असल्याचेही सांगितले जात आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आठव्या हप्त्यात जिल्हानिहाय रक्कम वितरित करण्यात आली असून, अहिल्यानगर ₹१०८.३० कोटी, अकोला ₹३६.७६ कोटी, अमरावती ₹५३.३४ कोटी, बीड ₹७२.७० कोटी, भंडारा ₹४१.६५ कोटी, बुलढाणा ₹६६.७४ कोटी, चंद्रपूर ₹४७.९५ कोटी, छत्रपती संभाजीनगर ₹६८.१८ कोटी, धाराशिव ₹४६.८५ कोटी, धुळे ₹३०.६३ कोटी, गडचिरोली ₹२८.५० कोटी, गोंदिया ₹४२.४५ कोटी, हिंगोली ₹३५.०० कोटी, जळगाव ₹७७.४० कोटी, जालना ₹५८.८२ कोटी, कोल्हापूर ₹९२.३३ कोटी, लातूर ₹५३.८७ कोटी, नागपूर ₹३३.८८ कोटी, नांदेड ₹७६.५० कोटी, नंदुरबार ₹२०.४७ कोटी, नाशिक ₹८३.८६ कोटी, पालघर ₹१९.९५ कोटी, परभणी ₹४९.७९ कोटी, पुणे ₹८५.२४ कोटी, रायगड ₹२२.७९ कोटी, रत्नागिरी ₹ ३१.२१ कोटी, सांगली ₹७५.४९ कोटी, सातारा ₹८७.०७ कोटी, सिंधुदुर्ग ₹२३.५३ कोटी, सोलापूर ₹९७.५२ कोटी, ठाणे ₹१४.१८ कोटी, वर्धा ₹२५.६० कोटी, वाशिम ₹३३.०५ कोटी आणि यवतमाळला ₹५७.१८ कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे.
‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेंतर्गत २४ मार्च २०२६ अखेर एक ते सात हप्त्यांमध्ये एकूण १३०१७.३० कोटी रुपये ९३.०८ लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण द्वारे जमा करण्यात आले आहेत.







