जळगाव लाईव्ह न्यूज । रेशनकार्डधारक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत एप्रिल महिन्यात तिप्पट धान्य देण्याची घोषणा केली आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थ्यांना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या निर्णयामुळे रेशन कार्डधारकांना पुढील महिन्यात तीनपट धान्य मिळणार असून, ते आपल्या सोयीप्रमाणे रेशन दुकानातून धान्य उचलू शकतील. गहू आणि तांदळाचा समावेश असलेल्या या योजनेचा फायदा देशभरातील कोट्यवधी लाभार्थ्यांना होणार आहे.

दरम्यान, केंद्राने यापूर्वीच राज्य सरकारांना जूनपर्यंतचे धान्य आगाऊ स्वरूपात उचलण्याचे निर्देश दिले होते. यामागे नवीन गहू खरेदीसाठी गोदामांमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
तथापि, एप्रिलमध्ये तिप्पट धान्य वितरणाचा निर्णय नेमका कोणत्या कारणासाठी घेण्यात आला, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तरीही या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.












