जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र सरकारने अनेक राज्यांच्या राज्यपालांमध्ये फेरबदल करत महत्त्वाचे आदेश जारी केले. या फेरबदलात तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी पदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला होता. जवळपास सहा महिन्यांनी महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले आहेत.राष्ट्रपती भवनाने रात्री निवेदन जारी करून या नियुक्त्या प्रसिद्ध केल्या.

कोण आहेत जिष्णू देव वर्मा?
त्रिपुराच्या राजघराण्यात जन्मलेले जिष्णू देव वर्मा हे ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात. २०१८ ते २०२३ या काळात त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले होते. तसेच वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकास सारख्या महत्त्वाच्या खात्यांचीही जबाबदारी सांभाळली होती.
१५ ऑगस्ट १९५७ रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे त्यांचा जन्म झाला. १९९० च्या दशकात त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. डाव्यांचे वर्चस्व असलेल्या त्रिपुरात वर्मा यांनी भाजपाची संघटना उभी करण्याचे काम केले. १९९६, १९९८ आणि १९९९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्रिपुरा पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली. राजकारणातील त्यांच्या दीर्घ अनुभवानंतर काही काळापूर्वी त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर आता ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आले आहेत.












