जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२५ । उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात कार्तिक पौर्णिमेनिमित्त एक दुर्दैवी अपघात घडला. चुनार रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेसने काही भाविकांना धडक दिली. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या रेल्वे अधिकारी आणि पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. प्रशासनाने प्रवाशांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी प्लॅटफॉर्म आणि ओव्हरब्रिजचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व यात्रेकरू गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी जात होते. हे यात्रेकरू चोपन-प्रयागराज पॅसेंजर ट्रेनमधून प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर उतरले होते. स्टेशनवर, यात्रेकरू घाईघाईने रेल्वे रुळ ओलांडत असताना त्यांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या हावडा- कालक एक्स्प्रेसने या सर्वांना चिरडलं. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला.

हा अपघात इतका भीषण होता की मृतदेहांचे तुकडे तुकडे झाले. मृतांची ओळख पटवणं देखील कठीण झाले आहे. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनभद्रहून येणारी गोमोह-प्रयागराज बरवाडीह पॅसेंजर ट्रेन सकाळी ९.१५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आली. कार्तिक पौर्णिमेच्या स्नानासाठी हे भाविक चुनारला आले होते. प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर उतरल्यानंतर त्यांनी विरुद्ध दिशेने प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी ट्रेनने त्यांना धडक दिली.











