जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात किरकोळ कारणावरून वाद होऊन यातून खुनासारख्या गंभीर घटना वाढताना दिसत असून अशाच एका घटनेमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील २१ वर्षीय तरुणाचा खून झाला. मलकापूर शहरात दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत चाकूहल्ला होऊन जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. सतीश गजानन झाल्टे (वय २१, रा. पिंप्राळा, ता. मुक्ताईनगर) असं मयत तरुणाचं नाव असून या हल्ल्यात त्याचा सहकारी अविनाश जितेंद्र झाल्टे (वय २३) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी चौघा संशयित आरोपी तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नेमकी काय आहे घटना?
मृत सतीश आणि जखमी अविनाश यांचा काही दिवसांपूर्वी मलकापूर येथील काही तरुणांशी धोंगर्डी फाट्यावर वाद झाला होता. सोमवारी सायंकाळी हे दोन्ही तरुण धोपेश्वर मंदिराजवळ एका हॉटेलमध्ये चहा घेत असताना, याच वादातील मलकापूरचे आरोपी तरुण त्या ठिकाणी आले. जुन्या वादावरून त्यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक झाली आणि याचे रूपांतर हाणामारी व चाकूहल्ल्यात झाले. या चाकूहल्ल्यात सतीश झाल्टे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला

तर या हल्ल्यात अविनाश झाल्टे हा देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथील खान्देश रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणात पोलिसांनी चार तरुणांना अटक केलीय. देवा तिलकसिंह राजपूत (२४, रा. सावजी फेळ), संकेत सुनील उन्हाळे (२१), साहिल सुधाकर पालवे (१८) आणि अरविंद अजय साळुंखे (१९) असं अटक केलेल्या तरुणांचे नसून या घटनेत आणखी काही युवक सहभागी असल्याचा संशय असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पुढील पोलीस अधिक तपास करत आहेत.












