जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२५ । जालन्यातून भीषण अपघाताची घटना समोर आलीय. ज्यात अनियंत्रित कार थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश असून ही घटना जालना जिल्ह्यातील राजुर–टेंभुर्णी रस्त्यावरील गाढेगव्हाण फाट्यावर घडली. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

या अपघातात मृतांची ओळख पटली असून ज्ञानेश्वर डकले, पद्माबाई भांबीरे, निर्मलाबाई डकले, ज्ञानेश्वर भांबीरे आणि आदिनाथ भांबीरे यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिकांच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसून मृतदेह आणि कार बाहेर काढण्यात आली आहे.

आई आपल्या आजारी असलेल्या लेकीला उपचारासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथे घेऊन जात असताना जालन्यातील गाढेगव्हाण फाट्यावर विहिरीत कार कोसळून दुर्दैवी अपघात झाला. ही कार रस्त्यालगत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तीला धडक देत विहिरीचे कठडे तोडून थेट विहिरीत कोसळली.
या अपघातामध्ये ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे डकले परिवार आणि भांबिरे परिवार या दोन्ही परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात निर्मलाबाई डकले (आजारी लेक), पद्माबाई भांबीरे (आई), ज्ञानेश्वर डकले (दीर), ज्ञानेश्वर भांबीरे (भाऊ) आणि आदिनाथ भांबीरे (भाऊ) यांचा समावेश आहे.









