जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२५ । राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्याच्या स्थितीनुसार, 5 ऑक्टोबर 2017 च्या शासन परिपत्रकानुसार पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयानुसार तासिकांची विभागणी लागू आहे.

मात्र, 16 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (न्यू एज्युकेशन पॉलिसी) अंमलबजावणी केली जाणार आहे. हे नवीन धोरण शालेय विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार असून, त्यानुसार तासिका आणि अभ्यासक्रमाच्या रचनेत बदल केले जाणार आहेत.
शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून नवीन शैक्षणिक धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. यावर्षी केवळ इयत्ता पहिलीसाठी हे नवे धोरण लागू होणार आहे. त्यानुसार पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी देखील यंदाच्या वर्षीपासून केली जाणार आहे.

या नव्या धोरणानुसार पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शालेय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने सर्व माध्यमांच्या शाळांसाठी इयत्ता पहिली व दुसरीसाठी हे सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 18 जून 2025 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार, नव्या शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेले सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. या वेळापत्रकात विषयवार तासिकांची स्पष्ट विभागणी करण्यात आली असून, नवीन अभ्यासक्रमाला अनुसरून ते रचण्यात आले आहे.
नवीन वेळापत्रकानुसार, संपूर्ण शालेय वर्षात एकूण 365 दिवसांपैकी 210 दिवस हे अध्ययन-अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी 35 आठवड्यांचा अभ्यासकाल निश्चित करण्यात आला आहे. उर्वरित दिवसांमध्ये परीक्षा, मूल्यांकन आणि सहशालेय उपक्रम राबवले जाणार आहेत.
परीक्षा व अनुषंगिक कृतीसाठी 14 दिवस,
सहशालेय उपक्रमांसाठी 13 दिवस,
आणि रविवार व इतर सुट्ट्यांसह एकूण 128 दिवस सुट्टीचे नियोजन करण्यात आले आहे.
शाळांचा अध्यापन कालावधी सर्व शाळांसाठी एकसमान ठेवण्यात आला असून, परिपाठ, मधली सुट्टी आणि समृद्धीकरण तासिकांमध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार थोडाफार फरक असू शकतो, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
या नव्या वेळापत्रकात गणित, पर्यावरण, भाषा, आरोग्य शिक्षण व कलाशिक्षण यांसारख्या विषयांना समप्रमाणात वेळ देण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल.












