जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२५ । यंदा वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनने राज्यातील काही भागाला मुसळधार पावसाने झोपडून काढले. या पावसामुळे अनेक ठिकाणी मे महिन्यात नदी नाल्यांना पूर आला. तर काही ठिकाणी पाणी घरात आणि शेतीशिवारातही पाणी शिरले होते. सध्या राज्यात मान्सून मंदावला आहे. दरम्यान, मान्सून तर आला पण पेरणी कधी करावी? अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याबाबतच कृषीतज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज्यातल्या हवामान खात्याने १० जूनपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई करू नये असा सल्ला दिला आहे. दुसरीकडे पंजाबराव डख यांनी एक इंच ओलावा असलेली जमिनी पेरणीसाठी पोषक असल्याचं सांगितलं आहे. १ जून नंतरचा पाऊस हा मान्सूनचा पाऊस असतो. मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ओलावा आहे. चांगले बियाणे आणि खत देऊन शेतीची मशागत करण्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिला आहे.

मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात पुढच्या दोन दिवसांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. १ जूनपासून ते ६ जूनपर्यंत सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणपट्ट्यात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र ६ जूनपर्यंत जर जमिनीत वापसा असेल तर शेतीची कामे करून घ्यावी. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील, असा विश्वास पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ‘दरवर्षी मुंबईतून मान्सून येतो. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस कमी पडतो. मात्र यंदा पूर्वेकडून मान्सून आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मग मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुष्काळ पट्ट्यातील जिल्ह्यांसाठीही यंदा आनंदाची बातमी असणार आहे. जूनमध्ये अनेक बंधारे भरून जातील.’, असं देखील पंजाबराव डख यांनी सांगितले.












