जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२५ । अमरावती येथून काम आपटून जळगावी घरी परतणाऱ्या दाम्पत्याचा कारला भीषण अपघात झाला. मुर्तीजापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावर झाडांना पाणी देणारा टँकर उभा असताना या कारने मागून जोरदार धडक दिली. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला पती जखमी झाले. कल्पना पराग लिमये ( रा. प्लाट नं 16 कोणाली बंगलो रिंगरोडच्या मागे जळगाव) असं अपघातातील मयत महिलेचं नाव आहे. तर ट्रॅक्टर चालक याचाही मृत्यू झाला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेबाबत असं की, जळगाव चे रहिवाशी असलेले लिमये दाम्पत्य हे अमरावती येथून १६ मार्च रोजी दुपारी काम आटवून जळगावकडे परत जात होते. दुपारीच्या सुमारास मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरील कुरूमनजवळील रस्त्यावर झाडांना पाणी देण्यासाठी उभे असलेल्या ट्रॅक्टरचे टँकरला कार क्रमांक (एमएच १९ बीजे ३९८१) ने जोरदार धडक दिली.
या अपघातात कल्पना लिमये यांच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पराग लिमये यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने मूर्तीजापुर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर दुखापत असल्याने पराग यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील खाजगी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. तर घामोरी बुद्रुक येथील ट्रॅक्टर चालक सुनील ठाकरे याचाही मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच माना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.