जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज (१३ एप्रिल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ७ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. नगरविकास विभाग, सामान्य प्रशासन, वैद्यकीय शिक्षण आणि नियोजन विभागासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय?
१) MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल
MPSC मार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध सेवांतील संवर्गांची संख्या ५३ वरून १५३ करण्यात येणार असून संयुक्त परीक्षा योजनेत नव्या सेवांचा समावेश होणार आहे. यामुळे भरती प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

२) टाटा पॉवरला जमीन हस्तांतरण
कुळगाव-बदलापूर येथील विकास आराखड्यात बदल करून वीज उपकेंद्रासाठी ४ एकर जमीन Tata Power कंपनीला देण्यास मंजुरी देण्यात आली.
३) मुंबईत स्किल टेक विद्यापीठ
मुंबईत IES स्किल टेक विद्यापीठ स्थापनेला हिरवा कंदील देण्यात आला. या निर्णयामुळे कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळणार आहे.
४) मच्छिमारांसाठी ६१ कोटींचा निधी
नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी (नाबार्ड) अंतर्गत सागरी जिल्ह्यांमध्ये मच्छिमारांसाठी मूलभूत सुविधा उभारण्यासाठी ६१.२४ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली.
५) आरोग्य क्षेत्राला मोठा आर्थिक आधार
राज्यातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी कडून तब्बल ३,७०८ कोटींचे वित्तीय सहाय्य मिळणार आहे.
६) आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचा विस्तार
NITI Aayog च्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी या सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे १७७ तालुक्यांमध्ये विकास योजनांची अंमलबजावणी होणार आहे.
७) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत बदल
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेशी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यात येणार असून सदस्यांची निवड आता निवडणुकीऐवजी शासनाकडून नामनिर्देशन पद्धतीने केली जाणार आहे.











