⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

पुरात वाहून गेलेल्या तरुणाच्या वारसास ४ लाखांची मदत

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२१ । पाचोरा येथील हिवरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या युवकाच्या वारसांना शासनाच्या नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत चार लाखांची मदत करण्यात आली. या रक्कमेचा धनादेश बुधवार दि.६ रोजी कुटूंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.

पाचोरा शहरातून वाहत जाणाऱ्या कृष्णापुरी येथील हिवरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात कृष्णापुरी भागातील शिवकॉलनीतील रहिवासी देवेंद्र धनराज शिंपी (वय-४०) हा युवक वाहून गेल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घटना घडली होती. पाचोरा शहरातून कृष्णापुरीकडे जाण्याच्या प्रयत्नात असतांना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने हा युवक वाहून गेला होता. दरम्यान, स्थानिक नागरिक व प्रशासनाने त्याचा शोध घेतला. मात्र त्याचा मृतदेह तब्बल आठवडाभरानंतर कुजलेल्या अवस्थेत सापडला होता.

पंधरा दिवसातच मिळाली मदत
संततधार पावसामुळे युवक वाहून गेल्याची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील यांनी तात्काळ या युवकाचा शोध घेण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. दरम्यान, सदर युवक सापडून न आल्याने अखेर त्यास मृत गृहीत धरत मदतीसाठीचा प्रस्ताव शासनदरबारी सादर करण्याचा सूचनाही प्रशासनास दिल्या होत्या. महसूल प्रशासनानेही तत्परता दाखवत तात्काळ प्रस्ताव सादर केल्याने अवघ्या पंधरा दिवसातच शासकीय मदत मिळाली. यासाठी तहसीलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, शहर तलाठी आर.डी. पाटील, लिपीक अमोल भोई यांनी परिश्रम घेतले.

मदतीचा धनादेश वारसांकडे सुपूर्द

तहसील कार्यालयात बुधवार दि.६ रोजी दुपारी ३ वाजता शिवसेनेचे मुकुंद बिल्दिकर, शहर प्रमुख किशोर बारावकर, जिल्हा उपप्रमुख ऍड. अभय पाटील, नगरसेवक सतिश चेडे, नगरसेवक बापू हटकर, माजी नगरसेवक गंगाराम पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, नगरसेवक विकास पाटील, तहसीलदार कैलास चावडे यांच्या हस्ते चार लाख रुपयांचा धनादेश मयत तरुणाच्या वारसांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्रवीण ब्राह्मणे, भूषण पेंढारकर यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, शासन सर्व प्रकारच्या नैसर्गीक आपत्तीत जनतेच्या पाठीशी असून काही दुर्दवी घटना घडल्यास जनतेने तात्काळ प्रशासनाला संपर्क कारावा, असे आवाहन मुकुंद बिल्दिकर यांनी यावेळी केले.