⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना २० कोटी ४२ लाखांची मदत; वाचा सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज | १२ एप्रिल २०२३ | राज्यात ४ ते ८ आणि १६ ते १९ मार्चला अवकाळी पाऊस झाला होता. यात जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांनाही मोठा फटका बसला होता. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात ११ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळाला फटका बसून तब्बल १८ हजार ३६४ शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याची नोंद झाली. अवकाळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी सरकारने २० कोटी ४२ लाख ६१ हजार रुपयांची भरपाई वितरित केली आहे.

गतवर्षा प्रमाणे यंदाही अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मार्च महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी सरकारने १७७ कोटी ३९ लाख ९१ हजार रुपयांची भरपाई वितरित केली आहे. त्यात नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, नगर जिल्ह्यातील ७० हजार ६६६ शेतकर्‍यांसाठीच्या ६३ कोटी ९ लाख ७७ हजार रुपयांच्या मदतीचा समावेश आहे.

जिल्हानिहाय मदत मिळालेल्या शेतकर्‍यांची संख्या, दोन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे असून (कंसात शेतकर्‍यांना वितरित करण्यात आलेला निधी) : धुळे-८ हजार ७१७-३ हजार ९४४ हेक्टर २ आर (६ कोटी ७५ लाख ९८ हजार), नंदूरबार-८ हजार ८३६-४ हजार ७३० हेक्टर ४ आर (८ कोटी १३ लाख २३ हजार), जळगाव-१८ हजार ३६४-११ हजार ९११ हेक्टर ९ आर (२० कोटी ४२ लाख ६१ हजार).