जळगाव लाईव्ह न्यूज । भडगाव तालुक्यातील (Bhadgaon Taluka) वाडे येथील पोलिस पाटील भूषण फकिरा पाटील यांच्या बेलवाडी शिवारातील शेतात बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढवित १४ शेळ्या जागीच ठार केल्याची घटना घडली होती. दुसऱ्या दिवशीही बिबट्याने शेळ्यांवर पुन्हा हल्ला चढवित २ शेळ्या ठार केल्या आहेत.

शेडला तारेच्या सभोवताली जाळ्या बसविल्या असून बंदिस्त शेड आहे. मात्र बिबट्याने या जाळ्यांवर चढून आत प्रवेश केला व शेळ्यांना ठार मारले आहे. ही दुसरी घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. दोन दिवसात १६ शेळ्या ठार झाल्याने एकूण २ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनामार्फत या घटनेच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.
वाडे परिसरात बिबट्याचा वावर सुरूच असून बिबट्याची दहशत पसरली आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान वारंवार होत असल्याचे चित्र आहे. शेतांमध्ये बैल, गायी, म्हशी, शेळ्या बांधलेल्या असतात. शेतकरी जनावरांच्या चारा, पाण्यासाठी दिवसा वा रात्री शेतामध्ये जातात. त्यामुळे जनावरांसोबतच शेतकऱ्यांचाही जीव धोक्यात आला आहे. आतातरी वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी पोलिस पाटील भूषण फकिरा पाटील यांनी केली आहे.