⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सर्वोत्कृष्ट संकल्पनातंर्गत अधिकारी गटात जिल्हाधिकारी अभिजित राऊतांचा द्वितीय क्रमांक

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२। राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2021- 22 मध्ये सर्वोत्कृष्ट संकल्पनातंर्गत शासकीय अधिकारी गटात जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांना 30 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. याशिवाय शासकीय कर्मचारी गटात जळगाव जिल्ह्यातीलच भडगाव नगरपरिषदेचे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी अजय राजाराम लोखंडे यांनी प्रथम, पारोळा शहरचे तलाठी निशिकांत सूर्यकांत पाटील यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला.

प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णय क्षमता आणण्यासाठी तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन 2021-22 पासून राबविण्यात येते.

या अभियानांतर्गत सहभाग घेवून सर्वोत्तम कामगिरी करणारी कार्यालये, अधिकारी व सर्वोत्कृष्ट कल्पना, उपक्रम सूचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात येते. ही स्पर्धा राज्यस्तरावर चार गटात घेण्यात आली होती. तसेच तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर हे अभियान व स्पर्धा राबविण्यात आली. स्पर्धेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रधानमंत्री पारितोषिक योजनेच्या धर्तीवर ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आले होते.

शासकीय अधिकारी गटात जळगावचे जिल्हाधिकारी श्री. अभिजित राऊत यांनी दुसरा क्रमांक पटकावला. त्यांनी सातबारा उताऱ्यातील दीर्घ कालावधीपासून प्रलंबित कालबाह्य फेरफार नोंदी वगळण्याची धडक मोहीम स्वयंस्फूर्तपणे जिल्ह्यातील महसूल यंत्रणेमार्फत राबवीत अद्ययावत अभिलेख तयार केले. या मोहिमेचा जिल्ह्यातील 32 हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला.

शासकीय कर्मचारी गटात भडगाव नगरपरिषदेचे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी अजय राजाराम लोखंडे यांनी पहिला क्रमांक पटकावला. त्यांना 50 हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र प्राप्त होणार आहे. त्यांनी न्यायालयीन निर्णय तसेच नगरपरिषदेमार्फत आकारल्या जाणाऱ्या करांबाबत सोप्या भाषेत व व्यंगचित्रांच्या माध्यमातून फोटोफ्रेमद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली. याच गटात पारोळा शहरचे तलाठी निशिकांत पाटील यांनी दुसरा क्रमांक पटकावला. त्यांना 30 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक जाहीर झाले आहे. त्यांनी स्वखर्चाने व लोकसहभागातून तलाठी कार्यालयाचे नूतनीकरण व सुसज्जीकरण केले.