⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

भाजपा-शिवसेना युती सरकारचे अभिनंदन : काय आहे कारण? घ्या जाणून

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळवून दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी- शिवसेना महायुती सरकारचे अभिनंदन करणारा ठराव शनिवारी पनवेल येथे झालेल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मंजूर करण्यात आला.हिंदुत्वाचा विचार आणि जनादेशाचा सन्मान करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना व सहयोगी आमदारांचे अभिनंदनही बैठकीत करण्यात आले. पक्षशिस्तीचा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यकारिणी बैठकीत धन्यवाद देण्यात आले.

कार्यकारिणी बैठकीत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजकीय प्रस्ताव, प्रदेश सरचिटणीस आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षण विषयक तर किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी शेती विषयक प्रस्ताव मांडला.

राजकीय प्रस्तावात म्हटले आहे की, २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने भाजपा -शिवसेना सरकारला १६१ जागांसह स्पष्ट बहुमत दिले होते.मात्र केवळ मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने भाजपा ची साथ सोडत काँग्रेस- राष्ट्रवादी शी हातमिळवणी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाडस करत हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार सत्तेत यावे यासाठी पुढाकार घेतला.

महाविकास आघाडी सरकारने नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवले. हे आरक्षण परत मिळावे यासाठी भारतीय जनता पार्टीने राज्यव्यापी आंदोलन केले.सत्तेत आल्याआल्या हे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने आवश्यक ती कार्यवाही केली, असे या संबंधीच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी पुरता उध्वस्त झाला.नैसर्गिक संकटाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, असे शेती विषयक प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.