⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जनावरांचा कळप थेट रेल्वेरुळावर आला, तितक्यात मेमू रेल्वेगाडी आली अन्.. चाळीसगावातील थरार घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२३ । चाळीसगाव तालुक्यात एक थरकाप उडवणारी घटना घडलीय. ती म्हणजे जनावरांचा कळप थेट रेल्वेरुळ ओलांडत असताना मेमू रेल्वेगाडीखाली सापडून गुराख्यासह सात गायी व एक म्हैस चिरडून ठार झाले. ही घटना बुधवारी दुपारी शिदवाडी गावाजवळ घडली. राजेंद्र भीमराव सूर्यवंशी (वय-५०, शिदवाडी) असे मृत गुराख्याचे नाव आहे.

चाळीसगाव- धुळे रेल्वे मेमू ट्रेन बुधवारी दुपारी धुळ्याहून चाळीसगावकडे येण्यास निघाली. राजमाने स्थानक सोडल्यानंतर ही मेमू जामदा रेल्वेस्थानकाकडे येत असताना दुपारी चार वाजून दहा मिनिटांच्या सुमारास जामदा (Railway) रेल्वेस्थानकाच्या अलीकडे शिदवाडी गावाजवळ खांबा क्रमांक ३४४ जवळ जनावरांचा कळप रेल्वेरुळावर आला. त्याचवेळी मेमूचा वेग अधिक असल्याने गुराख्यासह ही जनावरे मेमू रेल्वेगाडीखाली (Accident) सापडली. त्यात एकापाठोपाठ एक अशा सात गायी व एक म्हैस अशी आठ जनावरे चिरडून मृत्युमुखी पडली. एक पारडू जबर जखमी झाले.

घटना घडताच परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सोबतच घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनेनंतर धुळे- चाळीसगाव मेमू सुमारे तासभर शिदवाडी येथेच थांबून होती. त्यानंतर ती जामदा रेल्वेस्थानकावर नेण्यात आली. दरम्यान, सायंकाळी रेल्वेकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला.

दरम्यान, शिदवाडी येथील प्रतापसिंग वजेसिंग जाधव यांची ही जनावरे होती. त्यांच्याकडे सालदार म्हणून राजेंद्र भीमराव सूर्यवंशी (वय ५०) जनावरे राखण्याचे काम करीत होते. रेल्वेरुळावर जनावरे गेल्याने आणि समोरून रेल्वे येत असल्याने सूर्यवंशी जनावरे हाकण्यासाठी धडपड करीत असतानाच दुर्दैवाने तेही रेल्वेखाली सापडून त्यांचाही करुण अंत झाला. सूर्यवंशी एका हाताने दिव्यांग होते. ते ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेले होते व तेथून येऊन ते पुन्हा मूळ मालकाच्या शेतात कामासाठी आजपासून रुजू झाले होते. आज पहिल्याच दिवशी त्यांच्या मृत्यूने त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे