⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे – गिरीश महाजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आज भारनिमनाविरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “आघाडी सरकार मधील उदासीनता पाहून सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही आणि भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर जळगाव जिल्ह्यातील सर्व रस्ते बंद करण्यात येतील. शिवाय एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही.”

दरम्यान, भाजपने काढलेला जन आक्रोश मोर्चा हा केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात का काढला जात नाही? असा प्रश्न उपस्थित करत भाजपचा हा मोर्चा म्हणजे दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. एकनाथ खडसे यांच्या या टिकेवरही गिरीश महाजन यांनी हल्लाबोल केला.

गिरीश महाजन म्हणाले, महागाईविरोधात आघाडी सरकारने आंदोलन करून पाहावे, किती लोक येतात ते त्यांना कळेल. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढले असल्यामुळे त्याचा परिणाम भारतातही होत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत.”