⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

‘बंटी-बबली’चा भांडाफोड : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू गेली पळून, कथित मावसभाऊच निघाला पती

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२२ । सध्याच्या घडीला फसवणुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मात्र अशातच फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक लाख रुपये देऊन शहापूर (मध्य प्रदेश) येथील तरुणाने कंडारी (ता.भुसावळ) एका युवतीसोबत विवाह केला. मात्र, शौचास जाते असे सांगून विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी तिने कथित मावसभावासोबत शहापूर येथून पलायन केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमका काय आहे प्रकार?

शहापूर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी योगेश संतोष महाजन हे लग्नासाठी स्थळ शोधत होते. याबाबत त्यांनी रावेर येथील परिचित अतुल गुर्जर यांना सांगितले होते. १५ डिसेंबर २०२२ रोजी रसलपूरला गेल्यावर अतुलने त्यांना तुझ्या लग्नासाठी कंडारी (ता.भुसावळ) येथे मुलगी पाहिल्याचे सांगितले. त्यानुसार दोघे कंडारी येथे आल्यावर आशाबाई नावाच्या महिलेसोबत परिचय झाला. तिने जया सुधाकर पाटील (रा. सुभाष राेड, नाशिक) व तिचा मावसभाऊ सुनील यांच्यासोबत परिचय केला. जयाने होकार देताच आशाबाईने लग्नाच्या बदल्यात एक लाख रुपयांची मागणी केली. येथे बोलणी नक्की झाल्यावर एका वकिलाकडून नोटरी करून घेत १६ डिसेंबरला जया व योगेशने लग्न लावले. साक्षीदार म्हणून आशा भगवान ठाकरे हिने स्वाक्षरी केली. यानंतर योगेशने ठरल्यानुसार आशाबाईला एक लाख रुपये दिले. याेगेश, त्याचे वडील संताेष महाजन, त्यांचा मित्र अण्णा उपस्थित होते.

दरम्यान, जया शहापूरला जाण्यासाठी निघाल्यावर दुसऱ्या दिवशी माहेरी येताना सोबत म्हणून मावसभाऊ सुनीलला साेबत घेऊन सर्व जण शहापूरला गेले. यानंतर दुसऱ्या दिवशी जय व सुनीलने पलायनाचा प्रयत्न करताच या फसवणुकीचा भांडाफोड झाला.दरम्यान, याच लोकांकडून इतरही लोकांची फसवणूक झाली आहे का? यादृष्टीने तपास सुरू आहे.

शाैचालयाच्या बहाण्याने दुसऱ्याच दिवशी काढला पळ

विवाहाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.१७) रात्री सुनील व नंतर जयादेखील पळाले. कुटुंबीयांनी त्यांच्याकडे विचारणा करताच तिने शौचास जाते असे सांगितले. पण, घरातच शाैचालय आहे असे सांगितल्यावर सुनील पुढे, तर जया त्याच्या मागे धावू लागली. नंतर कुटुंबीयांना त्यांना पकडून विचारणा केली. त्यात दोघे नवरा-बायको असल्याचे समोर आले. नंतर आधारकार्डच्या तपासणीवरून जयाचे खरे नाव निकिता सुधाकर साेळंके (रा.कानाेली, ता.दर्यापूर, जि.अमरावती) तर तिच्या साेबतच्या तरुणाचे नाव विठ्ठल शामराव काकडे (रा.पळशी, ता.सिल्लाेड, औरंगाबाद) असे समाेर आले. दोघांना शहापूर पाेलिस ठाण्यात नेल्यावर भुसावळ येथे पाठवून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर पोलिसांनी सोमवारी रात्री कंडारी येथून आशाबाईला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अतुल गुर्जरचा शाेध सुरू आहे.