⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

अतिवृष्टीमुळे पीक गेलं; २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील जामने (सार्वे) येथील २६ वर्षे तरुण शेतकऱ्याने कापसाचे उत्पादन न आल्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. राहुल राजेंद्र पाटील (वय २६) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.

जामने येथील राहूल पाटील यांनी आपल्या वडीलांकडून पाच एकर जमीन मालकिने कसण्यासाठी घेतली होती. त्यात कापसाचे पीक लावले हाेते. परंतु, अतिवृष्टीमुळे संपूर्ण कापसाचे पीक वाया गेले. केलेला खर्चही निघाला नाही. वडिलांचे मालकिचे पैसे कसे द्यायचे व संसार कसा चालवायचा या विवंचनेत त्याने शेतातील शेडवर जावून गळफास लावून आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली.

दरम्यान, त्यांचे लहान बंधू गणेश पाटील हे साेमवारी सकाळी ८.३० वाजता शेतात गेले असता त्यांना हा प्रकार आढळून आला. या प्रकरणी पिंपळगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास सहाय्यक फौजदार विजय माळी करत आहेत. मृत राहुल पाटील यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, अडीच वर्षांची मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे.