जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे महिलांवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. तुझ्या नवऱ्याला फारकत देऊन माझ्यासोबत लग्न कर, असे म्हणत एका तरुणाने महिलेचा हात पकडून विनयभंग केला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेली २५ वर्षीय महिला रात्री १०.३० वाजता ढाकेवाडीतून जात असताना आकाश सुरेश जोशी (रा. नाथवाडा) आणि अनूप प्रमोद जोशी (रा. जोशी कॉलनी) या दोघा तरुणांनी तिला अडवले. या वेळी आकाश जोशी याने महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला. तू तुझ्या नवऱ्याला फारकत दे आणि माझ्यासोबत लग्न कर अशी त्याने मागणी केली. महिलेने त्याला नकार दिल्यानंतर त्याने तिला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

अनूप जोशी यानेही महिलेला शिवीगाळ केली आणि तू आकाशसोबत लग्न कर, नाहीतर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकाश सुरेश जोशी व अनूप प्रमोद जोशी या दोघांविरुद्ध विनयभंग करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.










