⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

शिंदे सरकार स्थापनेसाठी जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा मी जात नव्हतो मात्र.. मंत्री गुलाबरावांनी सांगितला तो किस्सा

जळगाव लाईव्ह न्यूज । 10 मार्च 2024 । एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल 40 आमदार फुटले होते. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना नेमकं का सोडून गेलो? याबाबत वक्तव्य केले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील रीधुर गावातील अवचित हनुमान मंदिरावरील विकास कामांच्या सोहळ्यात जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडण्यामागचं कारणही सांगितलं. ते म्हणाले की, शिंदे सरकार स्थापन करण्यासाठी जेव्हा बाहेर पडलो. तेव्हा मी जात नव्हतो मात्र शेवटी शिंदे साहेबांचा फोन आला आणि तेव्हा मी गेलो. 40 आमदार गेले त्यात जाण्यामध्ये माझा 33 वा नंबर होता, अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना सोडून बाहेर पडल्यानंतरची सांगितली.

आम्ही गद्दारी केली नाही..शिवसेनाप्रमुखांनी जो भगवा झेंडा आमच्या हातामध्ये दिला होता तर भगवा झेंडा घेऊनच आज काम करतोय उद्याही करणार आहोत आणि मरेपर्यंत करणार आहोत असंहे गुलाबराव पाटील म्हणाले. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आज अभिमान वाटतो की तो निर्णय घेतला नसता तर कदाचित आज एवढी काम झाले नसते.नुसतं गावात आपला सरपंच जरी नसला तरी किती हाल होता. सरपंचाच्याच बाजूच्या माणसाच्या पोलवर गावात लाईट लागतो. विरोधकाच्या पोलवर लाईट लागत नाही. 16 महिन्यांमध्ये दहा वेळा जळगाव जिल्ह्यामध्ये येणारा हा एकमेव मुख्यमंत्री आहे की ज्याचे नाव एकनाथ शिंदे आहे.

माझ्या मतदारसंघात असे एकही गाव कुणी सांगू शकत नाही त्या गावात मंत्री गुलाबराव पाटील यांचा निधी पोहोचला नाही. मी आठ वर्षापासून मंत्री आहे.. पण कोणीही असं म्हणू शकत नाही की गुलाबराव पाटलांनी त्यांच्या अंगात मंत्रीपद आणलं. मी तुमच्याशी खोटं बोलू शकतो पण मी स्वतःच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही, असंही ते म्हणाले