जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका आता दिवसेंदिवस वाढू लागला असून, शुक्रवारची रात्र या हंगामातील सर्वात थंड रात्र ठरली आहे. ‘आयएमडी’नुसार शुक्रवारी जळगाव शहराचे किमान तापमान राज्यात सर्वाधिक कमी १२.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.

यंदा ऑक्टोबर महिन्यातच थंडीची चाहूल लागली होती. मात्र, दिवाळीदरम्यान अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे उत्तरेकडील थंड वारे काही काळासाठी रोखले गेले. दरम्यान मागच्या काही दिवसापासून अवकाळी पावसाचे वातावरण निवळले असून यामुले आता जळगाव जिल्ह्यात हळूहळू थंडीचा कडाका वाढू लागला आहे.

शुक्रवारी रात्रीच्या तापमानाची नोंद थेट १२.६ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. अचानक दोनच दिवसांत थंडी वाढल्यामुळे जळगावकरांनी आता स्वेटर आणि मफलर काढायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात थंडीचा कडाका जास्त राहणार असल्याचा स्पष्ट संकेत जळगावकरांना मिळाला आहे. गेल्या दोन दिवसात रात्रीचा पारा ९ अंशांनी घसरला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत रात्रीचा पारा अजून घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात जागोजागी शेकोटी पेटलेल्या दिसतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी वाढली आहे, त्यात जिल्ह्यात कोरडे हवामान असल्याने, उत्तरेकडील वाऱ्यांना राज्यात प्रवेशासाठी पुरक वातावरण आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात थंडीचा कडाका वाढेल अशी शक्यता आहे.







