जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं यासाठी महायुतीमध्ये चर्चा सुरु आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही ठिकाणी युतीकडून जागा वाटपात मोठी अपेक्षा असून जागा वाटपात समाधान न झाल्यास प्रसंगी विरोधकांसोबत आघाडी करुन या निवडणूका लढवल्या जातील, असे खळबळजनक विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जळगावात केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील सुमारे २०० इच्छुक उमेदवारांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. नगरपालिका, नगरपरिषद निवडणूकांमध्ये काही ठिकाणी इच्छुकांनी मोठी गर्दी आहे. तेथे निर्णय घेणे अवघड होणार आहे. रावेरच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची युतीसोबत लढण्याची मनस्थिती नाही. तेथे आघाडीचा प्रयोग केला जाणार आहे.

त्यासाठी पक्षश्रेष्टींची परवानगी घेतली जाईल. चाळीसगाव, एरंडोल व पारोळा येथील नगरपालिकांमध्ये आघाडी करावी लागेल, असे चित्र आहे. तेथे चाचपणी सुरू आहे. तर अदर्जाच्या भुसावळ नगरपालिकेत नगरसेवक ते नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार तयार आहेत. त्या ठिकाणी युतीकडून जागा वाटपात मोठी अपेक्षा आहे. समाधानकारक जागा मिळाल्या तर युतीमध्ये निवडणूक लढवू अन्यथा आघाडी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी स्थानिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची शिंदे गटासह अजित पवार गटासोबत जाण्याची तयारी असल्याचे वक्तव्य एका नेत्याने केलं आहे. भाजप वगळून कुणासोबतही आघाडी करण्याचे स्पष्ट निर्देश आम्हाला असल्याचे खळबळजनक वक्तव्य शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.









