जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. मध्य रेल्वेने भुसावळ -मिरज तसेच अमरावती – पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष या गाड्यांना जळगाव स्थानकांवर थांबा असल्याने जळगावकरांची सोय होणार असून जागेचा प्रश्न सुटेल.

प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने भुसावळ -मिरज अनारक्षित विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला. या गाडीच्या दोन फेऱ्या होतील. ०१२०९ क्रमांकाची विशेष गाडी २३ जानेवारीला सायंकाळी ४.५० वाजता भुसावळ येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५० वाजता मिरज येथे पोहोचेल. परतीची ०१२१० क्रमांकाची गाडी २६ जानेवारी रोजी मिरज येथून सायंकाळी ७ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता भुसावळ येथे पोहोचेल.

या गाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी आणि सांगली येथे थांबे असतील.
अमरावती – पनवेल अनारक्षित विशेष गाडीच्या दोन फेऱ्या होतील. ०१४१६ क्रमांकाची गाडी २२ जानेवारीला अमरावती येथून दुपारी १२ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पनवेल येथे पोहोचेल. ०१४१५ क्रमांकाची परतीची गाडी २६ जानेवारीला पनवेल येथून रात्री ७.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता अमरावती येथे पोहोचेल.
या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा आणि कर्जत येथे थांबे देण्यात आले आहेत.







