जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२२ । खर्डी ता चोपडा येथून तिन बैलांची चोरी करून रात्रीच पसार होण्याच्या बेतात असणाऱ्या चोरांच्या योजनेवर बिडगाव जवळ तुटलेल्या तारांमुळे पाणी फेरले गेले.मात्र त्र शेतकऱ्यांच्या दोन बैलांचा दुदैवी मृत्यू झाला. तर एक बैल या घटनेतून बचावला असून बैल चोरणारे आरोपी मात्र पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.
याबाबत सविस्तर असे की, खर्डी ता.चोपडा येथील येथील मोहन ओंकार पाटील व अनिल दामू चांभार या शेतकऱ्यांचे ग्राम पंचायत जवळ गोठे आहेत. तेथे नेहमी प्रमाणे बैलं बांधलेले होते. सोमवारी (ता.१८) मध्यरात्री चोरट्यांनी या गोठ्यांमधून मोहन पाटील यांचा एक बैल व अनिल चांभार यांची बैलांची जोडी असे तीन बैल चोरून रात्रीच शेतशिवारातून ६ कि.मी. पर्यंत मजल मारली. मात्र बिडगाव जवळ अरविंद निळकंठ पाटील यांच्या शेतात विजपुरवठा करणारा तार तुटून पडला होता. त्यात विजपुरवठा असल्याने शॉक लागून दोन बैल मृत झाले.
घटना मंगळवारी (ता.१९)सकाळी लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी धाव घेत बैलांची ओळख पटवली. ते खर्डी येथील असल्याचे त्यांना माहीती दिली असता बैल मालकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तिसऱ्या बैलाचा शोध घेतला असता तो जवळच शेतात आढळून आला. चोर मात्र पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.