⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

उद्धव ठाकरे आजच देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा?

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । शिवसेना (Shiv Sena) आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी (Mahaviakas Aghadi) सरकार संकटात सापडली असून अल्पमतात आल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून, उद्या बहुमत सिद्ध करावे असे म्हटले आहे. मात्र, आमदारांच्या बंडखोरीनंतर बहुमतच आघाडीच्या बाजूला नसल्यामुळे सभागृहात नाचक्की होण्यापेक्षा अगोदरच राजीनामा देण्याच्या मनस्थितीत मुख्यमंत्री असल्याचं सांगितलं जात आहे.

बहुमत चाचणीला सामोरे न जाता उद्धव ठाकरे हे आजच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (CM Uddhav Thackeray Resignation) देण्याची दाट शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने बहुमत चाचणीच्या आदेशाला विरोध करत याचिका दाखल केली असून या याचिकेवरील निकालानंतर तातडीने राजीनाम्याचा निर्णय होणार असल्याचे समजते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आहे. शिंदे यांना शिवसेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले असून, अल्पमतात आल्याचे चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. उद्या बहुमत सिद्ध करावे असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या या पत्रात म्हटले आहे. मात्र त्याआधी उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, आज होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकी पार पडणार आहेत. या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये औरंगाबाद विमानतळास छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे आज होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेकडून नामकरणाचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.