⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

संजय राऊतांबाबत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली ‘ही’ भीती

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक केली होती. तब्बल 102 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर संजय राऊत यांनी अखेर काल बुधवारी जामीन मिळाला. त्यांनतर आज दुपारी मातोश्रीवर (Matoshree) जाऊन संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांबाबत एक भीती व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना पुन्हा एखाद्या खोट्या प्रकरणात गोवलं जाऊ शकतं, अशी भीती व्यक्त केली आहे. हायकोर्टाने संजय राऊत यांची अटक बेकायदेशी असल्याचं परखड निरीक्षण बुधवारी नोंदवलं होतं. यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, एवढ्या चपराकी लाज वाटण्यासारख्या आहेत. हे (भाजपचं सरकार) केंद्रात सरकार नसतं तर अशा घटना घडल्या नसत्या. कर नाही त्याला डर कशाला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना यावेळी सुनावलंय.

संजय राऊत यांना गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी गोवण्यात आलं असल्याचा आरोप याआधीही शिवसेनेकडून करण्यात आला होता. फक्त ईडीच नव्हे तर वेगवेगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही राऊतांनी वेळोवेळी केला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा उद्ध ठाकरे आणि संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधलाय.