⁠ 
रविवार, मे 5, 2024

अत्यंत दुर्दैवी ! अंगावर वीज पडल्याने दोन महिलांचा मृत्यू ; भुसावळ तालुक्यातील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास विजांच्या गडगडासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र यादरम्यान, एक दुर्दैवी घटना भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात घडलीय. शेतामध्ये काम करीत असताना वीज पडल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मिनाक्षी रविंद्र तळेले (वय ३४ ) व अनिता उर्फ ममता विनोद पाटील (वय३३) असे मृत महिलांचे नाव आहे. या दुर्घटनेबाबत वरणगाव पोलिसांत आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे

याबाबत असे कि, आज (ता. २६ ) मंगळवार सकाळ कोरडे वातावरण असल्याने शेतकरी वर्ग मजुरांसह शेतात होते. त्याच दृष्टीने सुसरी येथील शेतमजूर रविंद्र सदाशिव तळेले (वय ४०) हे मिनाक्षी रविंद्र तळेले व अनिता उर्फ ममता विनोद पाटील या महिलांसह विल्हाळे शिवारातील शेतात काम करत असताना अचानक दुपारच्या सुमारास विजांच्या गर्जनांसह पावसाला सुरूवात झाली.

अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची धांदल उडाली. सोबत असलेले रविंद्र तळेले हे गुरांचे वैरण चिखलाने घाण होईल त्यामूळे ते शंभर मिटर अंतरावर बैलगाडीत वैरण टाकत होते. अनिता उर्फ ममता पाटिल व मिनाक्षी तळेले या मजूर महिला पाऊस सुरू असतांना बैलगाडीकडे येत असतांना अचानक या महीलांवर वीज कोसळल्याने यात या दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच शेजारील शेतात काम करणार्‍या वत्सलाबाई आनंदा तळेले (वय ५५ ) यांना सुध्दा जबर झटका बसल्याने त्या जखमी झाल्या आहेत. तर, रविंद्र तळेले हे त्या महिलांपासुन काही अंतरावर असल्याने ते सुदैवाने बचावले आहेत.

या घटनेबाबत वरणगाव पोलिसांत आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर परीसरातील शेतकरी व मजूर वर्ग पुर्णतःधास्तावलेला असुन या दुःखद घटनेमुळे सुसरीगाव व मृतक माहिलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मातेच्या मृत्यूमुळे बालके पोरकी झाली आहेत.