जळगाव लाईव्ह न्यूज । गुजरात ते पश्चिम बंगाल तसेच मुंबई ते कोलकाता या महत्त्वाच्या मार्गांवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दोन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे जळगाव व भुसावळ परिसरातील प्रवाशांना उत्तर व पूर्व भारतात प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे.

गुजरातहून पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी उधना–मालदा टाऊन साप्ताहिक विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. क्र. ०९०३३ ही गाडी ९ एप्रिल ते २३ जुलै या कालावधीत दर गुरुवारी रात्री ११ वाजता उधना येथून सुटेल. तर क्र. ०९०३४ ही गाडी १२ एप्रिल ते २६ जुलै दरम्यान दर रविवारी सकाळी ९:३० वाजता मालदा टाऊन येथून परतीचा प्रवास करणार आहे.

या गाडीला नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, प्रयागराज छिवकी, पाटणा आणि भागलपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस–हावडा विशेष गाडी देखील सुरू करण्यात आली आहे. क्र. ०११४५ ही गाडी १४ एप्रिल रोजी रात्री ८:१५ वाजता मुंबई येथून सुटेल, तर क्र. ०११४६ ही गाडी १६ एप्रिल रोजी दुपारी २:४५ वाजता हावडा येथून परतीचा प्रवास करेल.
या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, रायपूर, बिलासपूर आणि टाटानगर या स्थानकांवर थांबे असतील. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे विशेषतः जळगाव आणि भुसावळ परिसरातील प्रवाशांना सणासुदीच्या काळात मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.







