जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२६ । जळगावच्या चोपडा तालुक्यातील भीषण अपघाताची घटना समोर आलीय. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अर्टिका कार दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून दोन जण ठार तर तीन जण जखमी असल्याची माहिती आहे. राहुल अमृत भोई आणि मयुर अरुण राजपूत अशी मृतांची नावे असून ही घटना चोपडा-विरवाडा रस्त्यावर आज सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच तरुण गेल्या आठ दिवसांपासून जैन धर्मीयांच्या एका पारमार्थिक कार्यक्रमात सहभागी होत होते. आज या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता. नेहमीप्रमाणे पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हे तरुण विरवाड्याहून चोपड्याकडे येत असताना त्यांच्या कार (MH 19 BS 1008) ला भीषण अपघात झाला.

या अपघातात राहुल भोई आणि मयूर राजपूत या दोघांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विजय अमृत भोई (वय ३५), राकू राजपूत (वय ३०) आणि बंटी कोळी (वय ३०) यांचा समावेश आहे. त्यात विजय भोई यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर राकू राजपूत आणि बंटी कोळी यांच्या हात-पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर चोपडा येथील मोरेश्वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.










