जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२६ । जळगाव तालुक्यातील आमोदा येथील आदिवासी टोकरे कोळी समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या मूर्तीची समाजकंटकांनी विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज जळगाव शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण समाजात तीव्र संतापाची लाट असून, दोषींना तत्काळ अटक करून कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

शिवतीर्थापासून मोर्चाला प्रारंभ
आज सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (शिवतीर्थ मैदान) येथून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात आदिवासी टोकरे कोळी समाजाचे शेकडो बांधव सहभागी झाले होते. हातात निषेधाचे फलक आणि घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. यावेळी समाजातील युवक, ज्येष्ठ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

नेमकी मागणी काय?
आमोदा गावात महर्षी वाल्मीक यांच्या मूर्तीची विटंबना करून धार्मिक भावना दुखावणारे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा. या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने कायदेशीर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी समाजबांधवांनी केली आहे.










