शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांची हकालपट्टी करण्यात येईल : संजय सावंत

जून 29, 2022 11:47 AM

जळगाव जिल्ह्यात शनिवारी शिवसेनेचा भव्य आक्रोश मोर्चा !

sanjay sawant

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । जळगाव जिल्ह्यातील ५ आमदार बंडखोरांच्या गटात सामील झाले आहे. आमदार गेले, पदाधिकारी गेले असतील पण कार्यकर्ते अजून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसोबत आहे. जिल्ह्यातील कोण शिवसेनेसोबत आहे हे तपासण्यासाठी शनिवारी जळगाव शहरात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली.

जळगावात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रसंगी जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, जाकीर पठाण, प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, मतीन सैय्यद, मानसिंग सोनवणे, फरीद शेख, शोएब खाटीक आदी उपस्थित होते. राज्यातील घडामोडी आणि शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी ते संपर्क मेळावा घेत संवाद साधत आहे.

संजय सावंत म्हणाले, कुटुंबप्रमुखला आपले घर तुटावे असे कधीही वाटत नाही. आपले घर शाबूत राहावे म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातली आहे. उद्धव ठाकरेंना सत्तेचा आणि पदाचा मोह नव्हता म्हणून त्यांनी वर्षा बंगला सोडला. जे बंडखोर बाहेर पडले त्यांना पदाचा आणि सत्तेचा मोह आहे म्हणून त्यांनी अजूनपर्यंत समोर येत सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा केली नाही, असे ते म्हणाले.

आज जिल्ह्यात संपर्क साधत असताना अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ उतरत आहे. आज माझ्यासोबत असलेले काही उद्या बाहेर पडू शकतात हे निश्चित आहे. आक्रोश मोर्चानंतर कोण आपले आणि कोण बंडखोर हे समोर येईल. पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे संजय सावंत म्हणाले. शनिवारी दुपारी २ वाजता चित्रा चौक ते अजिंठा चौफुली असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आज पक्षाशी बंडखोरी करून स्वतःला दिग्गज समजणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांनी राजीनामा देऊन दाखवावा, असे आवाहन सावंत यांनी केले आहे.

चोपडा विधानसभा मतदार संघाच्या आ.लता सोनवणे यांना उमेदवारी देताना आज बंडखोरांचे नेतृत्व करणारे जिल्ह्यातील पुढारी माधुरी पाटील यांच्या नावाची शिफारस करीत होते. तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी आ.चंद्रकांत सोनवणे व शामकांत सोनवणे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना उमेदवारी दिली. जात प्रमाणपत्र अवैधतेचा प्रश्न हा न्यायप्रविष्ठ बाब आहे, असे ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now