उष्णतेने घेतला ४८ कासवांचा बळी ; आसोदा जवळील घटना

मे 24, 2021 1:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ । जलवाहिनीच्या कामासाठी नाला वळविल्याने नाल्यातील अनेक कासव बाहेर येऊन लोखंडी पाईपमध्ये गेले. या पाईपात प्रचंड उष्णतेमुळे ४८ कासवांचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील असोदा गावाजवळ घडली.

kasav

ममुराबाद व परिसरातील शेतीसाठी बळीराजा योजनेंतर्गत पाणी देण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे. यासाठी असोदा ते आव्हाणे रस्त्यावर खोदकाम करून लवकी नाला वळविण्यात आला आहे. हा नाला वळविल्याने त्यातील काही कासव पाण्याबाहेर आले व ते जलवाहिनीत गेले. उन्हामुळे लोखंडी जलवाहिनी प्रचंड तापलेली असते आणि त्यात तिला वेल्डिंग केले जात असल्याने उष्णतेमुळे कासव मृत्युमुखी पडले.

‘मृत कासवे तशीच ठेवून ठेकेदाराने असंवेदनशीलता दाखवली आहे. वास्तविक हा अपघात नसून, हत्या आहे. त्या कासवांना पुन्हा नाल्यात पाठवता आले असते. पण कोणी काहीच केले नाही. दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी असोदा येथील नवनिर्मिती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष किशोर चौधरी यांनी केली.

या प्रकरणी वनविभागाच्या वतीने वनरक्षक अश्विनी ठाकरे, डी. डी. पवार, रेवन चौधरी, सुनीत बाविस्कर, असोद्याचे पोलीस पाटील आनंदा बिऱ्हाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील, वनपाल पी. जे. सोनवणे यांच्यामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. वन विभागाच्या वतीने मृत कासवांचा घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. त्या ठिकाणी ४८ मृत कासव आढळल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. इंडियन फ्लॅपशेल जातीचे हे कासव असून, मृत कासवांना जाळून नष्ट केले जाणार आहे. उन्हाच्या तीव्रतेने कासवांचा मृत्यू झाल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now