जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२५ । राज्यातील काही जिल्ह्ह्यात गुलेन बारे सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराने थैमान घातले असून आता या आजाराने जळगाव जिल्ह्यात एंट्री केली आहे. जळगाव तालुक्यातील एका ४५ वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत.

जळगाव तालुक्यातील एका भागात रहिवासी असलेली ४५ वर्षीय महिलेला अशक्तपणा, अंगदुखी, खांदे दुखणे, पाठ दुखणे, अचानक चालण्यास-बसण्यास त्रास होणे अशी लक्षणे जाणवली. कुटुंबीयांनी ३० रोजी संध्याकाळी तातडीने या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात आणल्यामुळे सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. न्यूरॉलॉजिस्ट डॉ. गोपाल घोलप, डॉ. अभिजित पिल्लई यांच्या देखरेखीखाली रुग्णाच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे, असे डॉ. बाचेवार यांनी सांगितले. राज्यात एकदम कमी रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. पाणी उकळून पिणे, स्वत:ची रोगप्रतिकारक्षमता वाढविणे तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत, असेही डॉ. बाचेवार म्हणाले.
काय काळजी घ्यावी
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?
दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.
कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या