जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील अंजाळे गावात एक अनोखी घटना समोर आली ज्यात समाजातील जुन्या रूढी-परंपरांना बाजूला सारत मुलीने पित्याला अग्निडाग दिला आणि सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय लिहिला. यामुळे समाजातील वंशाचा दिवा ही संकल्पना बाजूला सारली गेली.

प्रमोद सपकाळे यांना पुत्र नसल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला होता, परंतु त्यांच्या कुटुंबीयांनी हा प्रश्न सामोरे जाण्यासाठी एकत्र येत समाजातील परंपरेला छेद दिला. नीता वाघ यांनी आपल्या पित्याला स्वतः अग्निडाग दिला, तर स्वाती वाघ यांनी खांदा दिला. त्यांच्या या धाडसी निर्णयाने उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.
समाजाने लादलेल्या जुन्या परंपरांना फाटा देत सावित्री-रमाईच्या लेकींनी जबाबदारी पार पाडली आणि मुलीही अंतिम संस्कार करू शकतात, हे सिद्ध केले. ही घटना समाजासाठी एक नवा आदर्श आहे, जिथे पुत्र आणि पुत्री यांच्यात भेदभाव न करता समानतेची भावना पुढे येते. समाजातील कालबाह्य परंपरांना शह देत महिलांनी आपल्या कर्तव्याने नवा आदर्श निर्माण केला आहे.