⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

न्यायालयाने रस्त्यांची याचिका रद्द करण्याची मागणी फेटाळली

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांवर दाखल जनहित याचिका रद्द करण्याची महापालिका प्रशासनाची मागणी जिल्हा न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात खंडपीठात याचिका दाखल करण्यासाठी न्यायालयाने महापालिका प्रशासनाला १५ दिवसांची मुदत दिली आहे. याबाबतची पुढील सुनावणी २१ रोजी होणार आहे.

रस्त्यांच्या प्रश्नाबाबत ऍड. प्रदीप कुलकर्णी यांनी जिल्हा दिवाणी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यांच्या याचिकेवर मंगळवारी कामकाज झाले. गेल्या आठवड्यात न्यायालयाने आपलाच आदेश रद्द करण्यास नकार देत महापालिकेला खुलासा सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी महापालिकेच्या वतीने आलेली दावा रद्दची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.

ऍड. कुलकर्णी यांच्या याचिकेबाबत महापालिकेचे वकील आनंद मुजूमदार यांनी न्यायाधीश एस. एन. फड यांच्या न्यायासनासमोर अर्ज सादर केला. रस्त्यांचा प्रश्न हा जनहिताचा विषय असून, हा विषय उच्च न्यायालयाचा आहे. त्यामुळे ऍड. कुलकर्णी यांचा दावा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. ऍड. कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयाने बहाल केलेल्या अधिकारांची माहिती देत नागरी अधिकार असल्याने त्याच्या अंमलबजावणीचा अधिकार न्यायालयाला असल्याचे सांगितले. दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने महापालिकेची मागणी फेटाळली खंडपीठात याचिका दाखल करण्यासाठी १५ दिवसांची मुदत महापालिकेला दिली आहे