⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

थंडीचा कडाका आजपासून वाढणार, धुक्यात हरवेल जळगाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पारा एकदम खाली आल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून थंडी पुन्हा गायब झाली आहे. परंतु आजपासून पुन्हा थंडीचा कडाका वाढणार असून किमान तापमान १८ अंश सेल्सिअसवरून १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाणार असल्याने थंडीचा कडाका जाणवणार आहे. तसेच वातावरणात धुके वाढणार असून, वाऱ्याचा वेग ताशी १० किमीपर्यंत असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.

गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गार वाऱ्यांमुळे दिवसाही थंडी वाढली हाेती. दाेन दिवस सूर्यदर्शनच न झाल्याने थंडीची तीव्रता अधिक हाेती. त्यानंतर ढगाळ वातावरण निवळले असून, किमान तापमान १८.५ अंशांपर्यंत तर कमाल तापमान ३० अंशांपर्यंत गेले आहे. दोन दिवसापासून थंडी गायब झाली असून दिवसा गरम होऊ लागले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. त्यामुळे थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे.

जवाद वादळामुळे राज्यात निर्माण झालेले अवकाळी पावसाचे वातावरण असून अद्यापही काेकण आणि गोव्यात साेमवारी काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. तापमान घसरल्यानंतर जिल्ह्यावर धुक्याची चादर पसरली जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात किमान तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील असा अंदाज वर्तवला आहे.