⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

मुंबई येथील एजन्सीचा काम करण्यास नकार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२३ । शहरास मंजूर अमृत 2.0 योजनेच्या विकास आराखडा तयार करण्याच्या एजन्सी नियुक्तीचा घोळ अद्यापही संपलेला नाही. मागील महासभेत मुंबई येथील एजन्सी नियुक्तीचा ठराव करण्यात आला होता. परंतु या एजन्सीने काम करण्यास नकार दिल्याने पुन्हा एजन्सी नियुक्तीचा प्रश्न चिघळला आहे. मंजूर झालेल्या ठराव तीन महिने रद्द करता येत नसल्यामुळे येणाऱ्या ३० मे रोजी होणाऱ्या महासभेत एजन्सी नियुक्तीचा विषय घेता येणार नसल्याची समस्या निर्माण झाली आहे.

महापालिकेत मंगळवारी 30 रोजी होणाऱ्या महासभेबाबत आढावा बैठक महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात झाली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड शहर अभियंता चंद्रकांत सोनवणे आदी विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी महासभेच्या विषयाबद्दल आयुक्त व विभाग प्रमुखांची चर्चा करण्यात आली. तसेच अडचणीच्या विषयाबाबत अशा पद्धतीने मार्ग काढता येईल याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

एजन्सी नियुक्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
गेल्या आठ नऊ महिन्यापासून अमृत 2.0 योजनेच्या विकासा आराखडा तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्तीचा घोळ अद्यापही संपलेला नाही. मागील महासभेत सर्वात कमी दर देण्यात आलेल्या मुंबई येथील एजन्सीला काम देण्याचा ठराव करण्यात आला. परंतु आता या एजन्सीने त्यांच्याकडील कामाचा व्याप वाढला असल्यामुळे हे काम करता येत नसल्याचे मनपाला कळविले आहे. त्यामुळे पुन्हा एजन्सी नियुक्त करावी लागणार आहे. ठराव झाल्यानंतर तीन महिने हा ठराव रद्द करता येत नसल्यामुळे येणाऱ्या महासभेत हा ठराव घेता येत नाही आहे. परंतु याबाबत कार्यवृत्त तपासून दोन नंबरच्या कमी दराची आलेल्या एजन्सीचा प्रस्ताव मंजूर करून त्यांना नियुक्त करता येते का याबाबत आढावा बैठकीत चर्चा झाली.

३० रोजी महासभा
महापालिकेची ३० मे रोजी महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या सभागृहात महासभा होणार आहे. यात ४९ विषय विषय पत्रिकेवर आहे. यात घनकचरा प्रकल्प, रस्ते दुरुस्तीची कामे, रस्ते दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागांना हरकत प्रमाणपत्र देणे, जाहिरात बॅनर दर निश्चित करणे, मालमत्ता कर वर सूट आदी विषयावर चर्चा व निर्णय घेतले जाणार आहे.