⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

ठरलं ! ठाकरे गट-वंचित आघाडीच्या युतीची घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२३ । मागील काही दिवसापासून राज्यात नवनवीन घडामोडी घडतच आहे. अशातच ठाकरे गटाची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची आज घोषणा करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.

यावेळी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी युती संदर्भातील प्रास्ताविक केलं. यावेळी संजय राऊतहेही उपस्थित होते. ज्या स्वप्नाची महाराष्ट्राची जनता वाट पाहत होते. यापूर्वी असा प्रयोग झाला. पण प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पहिल्यांदाच एकत्र आलो आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळातील वाईट प्रथांवर प्रहार केले. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरू आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. देश प्रथम हा मुद्दा महत्त्वाचा घेऊनच आम्ही एकत्र आलो आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. देशात सध्या हुकूमशाहीचे वातावरण आहे. फक्त आम्हीच देशाचे तारणहार आहोत, असे वातावरण निर्माण केले जात आहे. जनतेला नको त्या वादात अडकवले जात आहे. आम्ही आता एकत्र येत आहोत, पुढील राजकीय वाटचालीसंदर्भातील निर्णय नंतर घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.