जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण आला. त्याने फरार घोषित होण्याचे वॉरंट रद्द करून घेतले. तर दुसरीकडे जितेंद्र कंडारे याने अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला आहे.

सुनील झंवरला दोन मार्चला मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून बचावासाठी १५ दिवसांचा दिलासा दिला. झंवर याने १५ दिवसांच्या आत पुण्याच्या सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून सुनावणीसाठी मुदत देण्यात आली. तर दुसरीकडे पुण्याच्या न्यायालयाने झंवर व कंडारे यांना फरार घोषित करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी घोषणापत्र जारी केले होते. या घोषणापत्रानुसार ३० दिवसांच्या आत म्हणजेच १४ मार्चपर्यंत दोघांना न्यायालय, पोलिसांना शरण येण्याचे वॉरंट काढले होते. या वॉरंटची मुदत येणाऱ्या आठवड्यात संपुष्टात आल्यानंतर दोघांना फरार घोषित करण्यात येणार होते, असे झाल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली असती. तत्पूर्वी झंवर याने पाच मार्च रोजी पुण्याच्या न्यायालयात स्वत: हजर राहून वॉरंट रद्द करून घेतले. झंवर याला १७ मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, दुसरा प्रमुख संशयित अवसायक कंडारेविरुद्धदेखील फरार संदर्भात घोषणापत्र जारी केले आहे. त्याला १४ मार्चपर्यंत न्यायालय, पोलिसांना शरण येण्याचे वॉरंट काढलेले आहे. तत्पूर्वी कंडारे याने पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर १२ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, सूरज झंवरने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी पूर्ण झाली असून, १० मार्चला निकाल आहे. दुसरा संशयित विवेक ठाकरेच्याही जामीन अर्जावर २४ मार्च रोजी निकाल आहे.