⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

चार दिवसापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने घेतला गळफास

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । शहरातील जोशीपेठ परिसरात राहणाऱ्या एका २० वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेत जीवन संपविले. तुम्पा वासुदेव घोराई (२०, मुळ रा.कोलकाता) असे विवाहितेचे नाव असून तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री जोशी पेठेत घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोलकाता येथील वासुदेव सनद घोराई यांनी तुम्पा यांच्याशी यापूर्वी नोंदणी पध्दतीने विवाह केला होता. आई-वडील चार ते पाच वर्षापासून जळगावात वास्तव्यास असल्यामुळे दोन महिन्यापूर्वी ते येथे आले होते. कुटूंबियांकडून विवाहाला होकार मिळाल्यानंतर वासूदेव व तुम्पा यांनी १३ डिसेंबर रोजी लग्न केले.

गुरुवारी रात्री जेवणानंतर वासुदेव व पत्नी झोपले होते. मध्यरात्री वासुदेव यांना लघुशंकेसाठी जाग आली. त्यानंतर ते पुन्हा त्यांच्या जागी आले. पंधरा ते वीस मिनिटानंतर पुन्हा जाग आल्यावर त्यांना पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले त्यांनी लागलीच पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पत्नी तुम्पा हिचा गळफास घेतल्यामुळे मृत्यू झाला होता. विवाहितेस जिल्हा रुग्णालयात हलविल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस कर्मचारी किरण पाठक करीत आहेत.