⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

सावदा येथे ‘हर घर तिरंगा’ उपक्रम जगजागृती साठी विविध कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज | दिपक श्रावगे | भारत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या स्मरणोत्सवाचा एक भाग म्हणून, भारत सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या वतीने आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत भारतीयांचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि कर्तृत्व जाणून घेण्याची संधी देण्यासाठी कार्यक्रमांची मालिका आखण्यात आली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (एकेएएम), हे स्वातंत्र्य सैनिक आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळींना अर्पण केलेली आदरांजली आहे.

आझादीचा अमृत महोत्सव महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमापासून १२ मार्च २०२१ पासून ७५ आठवड्यांसाठी सुरू झाला.भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा होणाऱ्या ‘आजादी का अमृत महोत्सवात’ लोकांचा जास्तीत जास्त सहभाग आणि जागरुकता सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या वतीने सुरु केलेला आहे. यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची मालिका तयार केली आहे. हा अमृत महोत्सव ‘जन भागीदारी’ आणि ‘जनआंदोलन’ च्या भावनेने साजरा केला पाहिजे.त्या अनुषंगाने सावदा नगर परिषद तसेच शहरातील विविध शासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालये यांच्या मार्फत हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याअंतर्गत आज सावदा नगरपरिषद संचलित श्री.नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर सावदा,तसेच एस. ए. जी.हायस्कूल सावदा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत रांगोळी स्पर्धा पार पाडल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक यांच्या आठवणी तसेच देशभक्तीची भावना जनमानसात कायम राहावी या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित ‘हर घर झेंडा’ अमृत अभियानांतर्गत शहरात जास्तीत जास्त ध्वज लावण्याचे नियोजन आहे.

13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर तर नागरिकांना स्वतःच्या घरावर स्वयंस्फुर्तीने ध्वज संहितेचे पालन करून राष्ट्रध्वज उभारावेत तसेच ज्या व्यापारी, दुकानदार,संगठना,अशासकीय संगठना,बचत गट तसेच नागरिकांना सदरील अभियान यशस्वी करण्याकरिता तिरंगा ध्वज दान करण्याची इच्छा आहे त्यानी नगरपरिषद कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन सावदा नगरपरिषद चे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग कैलास कडलग तसेच मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे.