Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । माणूस हयात असेपर्यंत संसाराच्या गाडा चालविण्यासाठी व कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी आयुष्यभर हालअपेष्ठा अपमान गिळत असतो, स्मशानभूमीच्या समस्येमुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रेताची अवहेलना होत आहे. रविवारी प्रेत जाळण्यासाठी शेतमालकाकडून जोरदार विरोध झाल्यामुळे अंतयात्रेतील उपस्थित लोकांनी समजून सांगण्याच्या प्रयत्न निष्पळ ठरला. अखेर शेतमालकाची सरशी झाली आणि रस्त्यालगच्या जागेवर अंत्यसंस्कार आटोपण्यात आले, दरम्यान प्रेताची अवहेलना झाल्याचे दिसून आले. वास्तविक गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून सदर स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार होत होते. पण जवळपास दोन महिन्यापासून त्या जागेवर अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली जात आहे. विशेष हे की, या जागेवर ग्रामपंचायतीने शेड सुद्धा उभारले आहे ज्या इसमाने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली तो आधीच वर गेला आहे, पण त्याचे वारसदार मेलेल्या माणसांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध करून देत नाहीत.

१७ सप्टेंबर २०२२ शनिवार रोजी भालगांव येथील प्रकाश दंगल पाटील वय ४५ वर्षे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी गावाच्या नेहमीच्या स्मशानभूमी पर्यंत अंतयात्रा गेली असता शेतमालकाने अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रतिबंध केला. त्यावेळी उपस्थित लोकांनी व बाहेरगावच्या नागरिकांनी शेतमालकाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु, काही एक उपयोग झाला नाही. जवळपास दीड ते दोन तासापर्यंत हा घोळ सुरू होता, अखेर त्या स्मशानभूमीच्या जागे समोर पाझर तलावासाठी शासनाने संपादित केलेल्या जागेवर अंत्यसंस्कार करण्याचे तयारी करण्यात आली पण त्यालाही त्यांनी विरोध केला. या मनमानीला कंटाळून अखेर रस्त्यालगतच्या जागेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यानच्या काळात अंत्यसंस्कार विधी पार पडण्यास बराच उशीर झाला, या वेळी एरंडोल पोलीस स्टेशनशी संपर्क काही सुजाण नागरिकांनी केला पोलीस गाडी घटनास्थळी आली त्यांनी सुद्धा शेतमालकाला समजावण्याच्या प्रयत्न केला. परंतु, त्यांनी काही एक ऐकून घेतले नाही एकंदरीत भालगांव या गावात मृत्यूनंतरही प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागेची समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामस्थ यांनी युद्ध पातळीवरून स्मशानभूमीच्या जागेच्या प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा आहे.