जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२५ । मागच्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पुरता खचलाय. शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्यासाठी सरकारने मदतीची घोषणा केलेली आहे. अशातच अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. तो म्हणजे अतिवृष्टीमधील जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून मदत दिली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना तात्काळ मदत करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मदतीसाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही. मराठवाडा, परभणी, अमरावती, अकोला, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यांना या शासन निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

एकूण जिल्हा वार्षिक निधीच्या ५ टक्क्यांपर्यंत खर्च करण्याची मुभा सरकारने दिली आहे. यापूर्वी केवळ टंचाईसाठी निधी वापरण्याची मुभा होती. त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता पूर , अतिवृष्टी , गारपीट यासाठी देखील जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वापरता येणार आहे.












