जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथे महामार्गावर गतिरोधक टाकण्यात आले आहेत. एरंडोल जामनेर रस्त्यावर बिलवाडी हे गाव आहे. या ठिकाणाहून अवजड वाहनांची येजा सुरू असते. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाटला होता. बिलवाडी फाट्याजवळ गतिरोधक टाकावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून मंत्री गुलाबराव पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत प्रतापराव पाटील यांनी गतिरोधक टाकण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर दोनच दिवसात बिलवाडी फाट्याजवळ गतिरोधक टाकण्यात आले आहेत. यामुळे बिलवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

बिलवाडी म्हसावद रस्त्यावर कुरकुर नाल्याजवळ देखील गतिरोधक टाकण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी अपघातग्रस्त ठिकाणाचा उल्लेख असलेला फलक देखील लावला जाणार आहे. त्याबाबत प्रतापराव पाटील यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

दरम्यान, बिलवाडी गावाजवळ गतिरोधक टाकल्याने वाहनांचा वेग कमी होणार असून अपघाताचा धोका देखील टळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, वृद्ध व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रताप भाऊंकडे शब्द टाकल्यानंतर तात्काळ काम मार्गी लागते याची प्रचिती देखील या निमित्ताने बिलवाडी परिसरातील नागरिकांना आली आहे. बिलवाडी येथील सरपंच विनोद पाटील यांनी, मंत्री गुलाबराव पाटील व प्रतापराव पाटील यांचे आभार मानले आहेत. प्रताप भाऊंना सांगितल्यानंतर दोनच दिवसात गतिरोधक टाकण्यात आले, पुढील गतिरोधकाचे व फलकाचे काम देखील लवकरच होणार आहे अशी माहिती विनोद पाटील यांनी दिली.







