जळगाव लाईव्ह न्यूज । उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते हावडा दरम्यान दोन अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. विशेष या गाडीला भुसावळला थांबा देण्यात आला असून यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडी क्रमांक ०११४५ विशेष रेल्वे १४ एप्रिल रोजी रात्री ८:१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता हावडा येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०११४६ विशेष रेल्वे १६ एप्रिल रोजी दुपारी २:४५ वाजता हावडाहून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११:४५ वाजता मुंबईत पोहोचणार आहे.

या विशेष गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खरगपूर आणि संतरागाछी या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.







