जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । नवरात्र उत्सवात बहुसंख्य नागरिकांचे उपवास असल्यामुळे साबुदाणा आणि भगर हे दोन पदार्थ मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. यामुळे या दोन्हीही पदार्थांना मोठी मागणी असते. तर दुसरीकडे भगर आणि भगरीच्या पिठाला ही मोठी मागणी पाहायला मिळते. मात्र याच भगरीमुळे आणि भगरीच्या पिठामुळे तब्बल ३६ जणांना विषबाधा झाल्याचे पाहिला मिळाले आहे.
औरंगाबादच्या लासूर स्टेशन भागात राहणाऱ्या 13 जणांना एकाचवेळी विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील 24 जणांना विषबाधा झाली आहे.
औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथे नवरात्रोत्सवानिमित्त भगर व भगरीचें पीठ परिसरातील विविध गावांमधील ग्रामस्थांनी खरेदी केले होते. मात्र या भगरीचे सेवन केल्याने 13 ग्रामस्थांना विषबाधा झाली आहे. याच बरोबर जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात देखील भगर व भगरीचें पिठातून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. परतुर तालुक्यातील चार गावांमधील 24 जणांना विषबाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. तर विषबाधा झालेल्या सर्वच व्यक्तींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.