⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

महापुरुषांच्या पुतळ्यांचे शिवसेनेने केले शुद्धीकरण : हे आहे कारण

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२२ । शिंदे गटात सहभागी झालेले गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्यांनतर त्यांनी धरणगावात मोठे शक्ती प्रदर्शन केले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी धरणगावातील महापुरूषांच्या स्मारकाला माल्यार्पण केले होते. मात्र त्याच महापुरुषांच्या पुतळ्यांचे शिवसेनेने दूग्धाभिषेक करून शुध्दीकरण केले.

शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील शिंदेवासी झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने भाजपा सोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची निवड झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे. यात जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे.

अशावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी लागोपाठ तिसर्‍यांना मंत्रीपदाची तर दुसर्‍यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे शनिवारी दिनांक १३ ऑगस्ट रोजी ते जिल्ह्यात पहिल्यांदा येणार असल्याने त्यांच्या अभूतपुर्व स्वागताचे नियोजन करण्यात आले होते. ना. गुलाबराव पाटील हे आज सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून निघाले. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चोपडी कोंडव्हाय फाटा येथे त्यांची जळगाव जिल्ह्यात एंट्री झाली. फटाक्यांची जोरदार आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि गगनभेदी घोषणांनी त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या हजारो समर्थकांनी ना. गुलाबराव पाटील यांचे स्वागत केले होते.

यावेळी गुलाबराव पाटील यांनी धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून धरणगावात शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. मात्र आज शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारंकांना दुग्धाभिषेक करून शुध्दीकरण केले.